
तुळजापूर : मंगळवार, दि.३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४४ ते ६:४८ या कालावधीत आलेल्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर येथे परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यात आले. ग्रहणकाळात देवींस विधीवत स्नान घालून श्वेत वस्त्र परिधान करून सोवळ्यात ठेवण्यात आले.ग्रहणकाल संपल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने देवीची सिंहासन पूजा, पंचामृत स्नान, शुद्धस्नान,आरती तसेच धुपारती हे दैनंदिन धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.चंद्रग्रहणाच्या काळात मंदिरातील धार्मिक परंपरा काटेकोरपणे पाळल्या जात असून,भाविकांमध्येही या विधींबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. मंदिर परिसरात शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असतात. ग्रहणकाळातील विशेष विधींमुळे भाविकांमध्ये आध्यात्मिक वातावरण अधिकच दाटून आले होते.