शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक

Spread the love

तुळजापूर – सप्टेंबरमध्ये साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

भाविकांच्या सेवेसाठी सोयीसुविधा

नवरात्र महोत्सवात दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. यावर्षीही मोठी गर्दी लक्षात घेऊन आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, वीज, पाणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

आरोग्य विभागाकडून यंदा अधिक प्रथमोपचार केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून, आपत्कालीन रुग्णवाहिकांची संख्या वाढवली जाईल. भाविकांची आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

स्वच्छता, पाणी आणि शौचालयांची सुविधा

तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने भाविकांसाठी शहरात पुरेशा प्रमाणात शौचालये, पाणपोया आणि कचरा व्यवस्थापन यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता मोहीमेस विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे काटेकोर निरीक्षण

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भाविकांना शुद्ध, स्वच्छ आणि ताजे अन्न मिळावे यासाठी हॉटेल व्यवसायिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. किचनची स्वच्छता, अन्न भेसळ तपासणी व शिस्तबद्ध सेवा यावर भर दिला जाईल. हॉटेल व्यावसायिकांकडून भाविकांना चांगली सेवा मिळावी याची विशेष खबरदारी घेतली जाईल.

वाहतूक आणि सुरक्षेसाठी कडक उपाययोजना

राज्य परिवहन महामंडळाकडून अतिरिक्त बसेस चालवण्याची व बस स्थानकात स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अवैध प्रवासी वाहतूक व जुनी, अपायकारक वाहने यांच्यावर कारवाई केली जाईल.

पोलीस विभागाकडून गर्दी नियंत्रणासाठी शहरात विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. यंदाच्या महोत्सवात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता असल्याने आवश्यक त्या सुरक्षा आणि एस्कॉर्टच्या व्यवस्थेबाबतही सविस्तर चर्चा झाली.

महोत्सवाचा मुख्य उद्देश – स्वच्छता आणि सुरक्षितता

या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले, “यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव ‘स्वच्छता व आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित असेल. देवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक सुखरूप घरी परत जाईपर्यंत त्याची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे.”

या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे महंत व पुजारी मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

  • Related Posts

    धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना नवे जीवन : नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी कोट्यवधींची योजना

    Spread the love

    Spread the loveजिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक ऐतिहासिक स्थान असून,येथे असलेला नळदुर्ग किल्ला हा प्रमुख आकर्षण आहे.हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.किल्ल्याची मूळ उभारणी कल्याणीच्या चालुक्य काळात…

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *