

धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व व राष्ट्राभिमान जागविणाऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘My Bharat (Mera Yuva Bharat)’ मेगा पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आले.या कार्यक्रमाचा शुभारंभ येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी मेगा पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेची सुरुवात केली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,तहसिलदार मृणाल जाधव,प्रकाश व्हटकर,मुख्याधिकारी निता अंधारे,विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

या मेगा पदयात्रेमध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आर्य चाणक्य प्रशाला, तेरणा पब्लिक स्कूल तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी,शिक्षक, पदाधिकारी आणि राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंसह जवळपास ३ हजार जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.युवक-युवतींच्या सहभागामुळे शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ही मेगा पदयात्रा सकाळी ८:३० वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून प्रारंभ झाली.महात्मा ज्योतिबा फुले चौक,सुनील प्लाझा मार्गे नगरपरिषद रोड,जिल्हा परिषद,शासकीय विश्रामगृह, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून कोहिनूर हॉटेलसमोर,जुने दूरदर्शन केंद्र,समतानगर,श्री चित्रमंदिर गोरें कॉम्प्लेक्स,महात्मा ज्योतिबा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेचा समारोप झाला.
समारोपावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच शिवश्री श्रीकांत गवळी आणि वसुंधरा गुरव या चिमुरड्यांच्या दमदार भाषणांनी उपस्थितांना प्रेरित केले आणि कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.