
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज
विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ क्र.२६ उस्मानाबाद-लातूर-बीड द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित नागरी क्षेत्रांमध्ये ‘कोरडे दिवस’ (ड्राय डे) जाहीर करण्यात आले आहेत. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दि.१८ जून २०२६ (गुरुवार) रोजी मतदान तर दि. २२ जून २०२६ (सोमवार) रोजी मतमोजणी होणार आहे.या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ (सी) तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम १४२ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीबाबत निर्बंध लागू केले आहेत.आदेशानुसार संबंधित कार्यक्षेत्रातील सर्व देशी व विदेशी मद्य घाऊक व किरकोळ विक्री तसेच ताडी विक्री अनुज्ञप्तीधारकांना (एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४ क्लब अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल/एफएल/टिओडी-३, टिडी-१ आदी) निर्धारित कालावधीत व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे.
कोरडे दिवस व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे
दि.१६ जून २०२६ (मतदान संपण्यापूर्वीचे ४८ तास) – दुपारी ४ वाजल्यापासून पुढे बंद.
दि.१७ जून २०२६ – (मतदान संपण्यापूर्वीचे ४८ तास) संपूर्ण दिवस बंद.
दि.१८ जून २०२६ (मतदानाचा दिवस) – दुपारी ४ वाजेपर्यंत बंद.
हे निर्बंध पुढील क्षेत्रांमध्ये लागू राहतील : धाराशिव नगरपरिषद हद्द, भूम नगरपरिषद हद्द,तुळजापूर नगरपरिषद हद्द,उमरगा नगरपरिषद हद्द,कळंब नगरपरिषद हद्द,परंडा नगरपरिषद हद्द,लोहारा नगरपंचायत हद्द आणि वाशी नगरपंचायत हद्द. तसेच दि.२२ जून २०२६ (मतमोजणीचा दिवस) रोजी धाराशिव नगरपरिषद हद्दीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ५४ व ५६ नुसार संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही करण्यात येऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिला आहे.
विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.