शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत कंपनीसोबतच कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, दिनांक १८ जून २०२६ रोजी अंदूर गावातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे ४०० ते ५०० बॅग कथित बोगस खत खरेदी केल्याची बाब समोर आली. हा प्रकार संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून जिल्हाधिकारी यांनी संबंधित दुकानदार व खत कंपनीच्या मालकाविरोधात कारवाईचे आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र या प्रकरणात केवळ दुकानदार व कंपनी नव्हे तर तालुका कृषी विकास अधिकारी, तालुका गुणनियंत्रक अधिकारी तसेच नळदुर्ग व अंदूर येथील कृषी सहाय्यक यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती कृषिमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच लोकायुक्त व उपलोकायुक्त कार्यालयाकडेही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनाचा इशारा देताना मनोज जाधव यांनी म्हटले आहे की, येत्या १५ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.