
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावात आला.

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार हे काल दि.५ जून रोजी रात्री तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौऱ्यासाठी उपस्थित होते. या दौऱ्यात तहसीलदार,गटविकास अधिकारी तसेच तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

गावात मुक्कामी थांबून जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक पाहणी न करता ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी,समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या.विशेषतः वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे,तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या संवादातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुस्पष्ट विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने दिशा निश्चित करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा विकास आराखडा अधिक प्रभावी व वास्तवदर्शी करण्यावर भर देण्यात आला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते सकाळी ८.३० या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यामध्ये अधिकारी,कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.त्यानंतर शिवार फेरी काढून शेतांमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला.तसेच “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा केवळ प्रशासकीय पाहणीपुरता मर्यादित न राहता,प्रशासन थेट जनतेच्या दारात पोहोचल्याचा प्रत्यय देणारा ठरला.गावकऱ्यांशी झालेला थेट संवाद आणि प्रत्यक्ष सहभागातून प्रशासनाबाबतचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे ग्रामस्थांनीही व्यक्त केले.