
धाराशिव – संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप तसेच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत.तसेच सार्वजनिक इमारतींवरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम राबवून जलस्रोत बळकट करावेत.पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करून त्याचा अपव्यय टाळावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी आज मंगळवारी (दि.२ जून) त्यांच्या दालनातून संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत हे निर्देश दिले.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक आर.व्ही.मांजरमकर, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एन.मदने,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.कटकधोंड,मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक दोन (उमरगा) चे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे,धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.पी.शिंदे उपस्थित होते.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,पुढील वर्षीही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.सिंचन प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्यास विनाकारण विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करू नयेत.तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून ज्या विहिरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत,त्यांची प्रत्यक्ष गरज तपासावी.