धाराशिव – जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.तुळजापूर,उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सात पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
उपकार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.२,उमरगा यांच्या कार्यालयाकडून प्राप्त अहवालानुसार,अल्प पावसामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.त्यानुसार संबंधित प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा जतन करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात आली होती.
प्रशासनाने राखीव केलेल्या प्रकल्पांमध्ये तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी लघुपाटबंधारे प्रकल्प, उमरगा तालुक्यातील आलूर लघुपाटबंधारे प्रकल्प व कोराळ साठवण तलाव प्रकल्प,तसेच लोहारा तालुक्यातील धानोरी लघुपाटबंधारे प्रकल्प,लोहारा लघुपाटबंधारे प्रकल्प,हिप्परगा लघुपाटबंधारे प्रकल्प आणि माकणीगाव (पी) साठवण तलाव प्रकल्पांचा समावेश आहे.
प्राप्त अहवालात नमूद केल्यानुसार, संबंधित सातही प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसल्याने अवैध पाणी उपसा होऊ नये,यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच या प्रकल्पांतील उपलब्ध पाणी केवळ नागरिकांच्या पिण्याच्या गरजांसाठीच नव्हे,तर परिसरातील जनावरांच्या पाण्याच्या आवश्यकतेसाठीही राखून ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.प्रशासनाच्या आदेशानुसार,संबंधित प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचा जास्तीत-जास्त कालावधीपर्यंत पिण्यासाठी उपयोग होण्यासाठी पाण्याचे काटेकोर जतन करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाकडून संयुक्त पातळीवर देखरेख ठेवली जाणार असल्याचे समजते.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या या आदेशामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.