
धाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) आणि बावी येथील आपले सरकार सेवा केंद्रांना भेट देऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्यासमवेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पांडुरंग साठे तसेच धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव उपस्थित होत्या.

अधिकाऱ्यांनी केंद्रावरील आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली,कामकाजाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना कोणताही मनस्ताप होणार नाही, प्रक्रिया सुरळीत,पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आधार प्रमाणीकरण हा महत्त्वाचा टप्पा असून,प्रशासनाकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गावात जाऊन सेवा केंद्रांच्या कामकाजाची पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.