तिसरा महात्मा म्हणायचे असेल तर प्रबोधनकार ठाकरे यांना म्हणा

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडथळे निर्माण केले गेले. त्या अडथळ्यांवर मात करीत त्यांनी काम सुरूच ठेवले. त्याच वेळी पेशवाई काळामध्ये दलितेत्तवर समाजावर देखील पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात बंधने लादली होती. तीच रग बाबासाहेबांनी पकडली. पुणे करार सुरू होता, त्यावेळी रक्ताने लिहिलेली धमकी देणारी पत्र बाबासाहेबांना यायची. त्यामुळे बाबासाहेबांना कोणताही धोका होऊ नये यासाठी बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी दलितेत्तर लोक रात्रभर पहारा देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत योगीराज बागुल यांनी दि.११ एप्रिल रोजी केले.
धाराशिव शहरातील नालंदा फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेबांचे दलितेत्तर सहकारी या विषयावर ते बोलत होते. यावेळी बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप रोडे, विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे व अरुण बनसोडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बागुल म्हणाले की, सिताराम चिंतामणराव जोशी हे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचे संस्थापक होते. ज्यावेळी बाबासाहेबांना कोर्टात प्रॅक्टिस करताना आर्थिक अडचण भासली. त्यावेळी जोशी यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी ट्युशन सुरू करून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांसह स्वतःची शिकवित असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब ब्रिटिश सरकारच्या काळात १९४२ मध्ये चार खात्यांचे केंद्रीय मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी जोशी यांना मुख्य कामगार आयुक्त होण्याची संधी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तर लोकमान्य टिळक यांचे पुत्र श्रीधर पंत व रामभाऊ पंत हे दोघेजण समाज समता संघाचे सदस्य झाले होते. दलितांना केसरी (गायकवाड) वाड्यात प्रवेश करण्याची बंदी होती. त्या काळात समाज समता संघाची शाखा बाबासाहेबांच्या हस्ते उघडल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक विलायचेला जाऊन आल्यानंतर त्यांना समाजाने शिक्षा दिली होती. त्या दिलेल्या शिक्षेचे पालन टिळकांनी केले. तर टिळकांची उजवी बाजू लिहिली. मात्र डावी बाजू लिहिली नसल्याचे त्यांनी सांगत त्यांनी ती सर्व गुपिते उघड केली. तसेच जर तिसरा महात्मा म्हणायचे असेल तर केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार यांना व लोकमान्य म्हणायचे असेल तर श्रीधर टिळक यांना म्हणावे असे आवाहन त्यांनी केले.
महाड सत्याग्रह दरम्यान गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे सुरबा नाना टिपणीस, अनंत चित्रे, सी.के. बोले, सुर्यवंशी (आर.डी. गवळी), राव, केशव सिताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार, चंद्रकांत अधिकारी, आचरेकर, नवल भथेना यांच्यासह इतर अनेक दलितेत्तरांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. तसेच बाबासाहेबांनी देखील त्याची उतराई केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रदीप रोडे म्हणाले की, बाबासाहेब प्रत्येकाच्या दुःखाबद्दल बोलले असून प्राणी वनस्पती याला देखील कसे संरक्षण दिले जाईल याचा विचार भारतीय संविधानात मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्प, देशी-विदेशी नीती याची देखील सविस्तर मांडणी केली आहे. तर ओबीसी व हिंदू कोड बिलासाठी त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे परिवर्तन करायचे असेल तर सर्व महामानवांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये जागणे आवश्यक आहे. त्यासाठी….महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा….सुरू करावी. त्यामध्ये सातत्य ठेवल्यास या माध्यमातून महामानवांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत निश्चितपणे पोहोचतील असे त्यांनी सांगितले. प्रारंभी महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती पवार यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व उपस्थितांचे आभार नागनाथ गोरसे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.अंबादास कळासरे, अमोल गडबडे, दीपक कांबळे, मिलिंद जानराव, त्रिशाला ठाणांबीर, मनिषा ताकपिरे, लीना सोनकांबळे, पंडित कांबळे, जयराज खुने, एल.बी. सुकाळे, सुनिल बनसोडे, प्रा.राम चंदनशिवे, व्ही.एस. गायकवाड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
