

धाराशिव,सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यानुषंगाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी दि.८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो.
या सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने आज ११ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह,धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर,विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते डॉ. संदीप तांबारे,जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ.दत्ता भोसले,डॉ. विनोद बर्वे,डॉ.क्षितिजा बनसोडे, डॉ.विनय कुलकर्णी,डॉ.महेश काळे,डॉ.सुजित नायकल,डॉ.खन्ना तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष,सचिव व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त,सचिन कवले यांनी केले.प्रमुख व्याख्याते डॉ.संदीप तांबारे,संचालक आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र, येरमाळा यांनी ज्येष्ठ नागरिकांनी या वयात तणावमुक्त जीवन कसे जगावे याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.विनोद बर्वे यांनी हाडांची काळजी घेण्याबाबत,तर डॉ.विनय कुलकर्णी यांनी आयुष्मान कार्डचे महत्त्व व ते प्राप्त करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.डॉ.दत्ता भोसले यांनी मधुमेह, शुगर व रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बचाव व त्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसुळ,जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघ यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपुत यांनी ज्येष्ठांनी या वयात आनंददायी जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष,सचिव व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.