
धाराशिव :- शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, निरागस आणि अविस्मरणीय काळ. इयत्ता पहिली ते दहावी, तसेच अकरावी-बारावी आणि पुढील शिक्षणाच्या प्रवासात लाभलेले वर्गमित्र, मैत्रिणी व सहकारी हे आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनून जातात. आई-वडील आणि शिक्षक हे घडविणारे मार्गदर्शक असले तरी बालमनात आपुलकी,जिव्हाळा आणि मैत्रीची बीजे पेरणारे हे वर्गमित्रच असतात.पुर्वीचा शैक्षणिक काळ हा गरिबी, दारिद्र्य आणि अनेक अडचणींनी व्यापलेला होता.मात्र त्या काळात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत जात-धर्म हा कधीच मैत्रीच्या आड आला नाही आणि आजही येत नाही.वर्गातील भांडणे सुद्धा मकरसंक्रांतीच्या तिळगुळा सोबत विसरली जात होती.वह्या-पुस्तकांची कमतरता असतांना एकमेकांची पुस्तके घेऊन अभ्यास केला जात होता. पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी उडवत मित्रांसोबत मस्ती करतांना शेजारून जाणाऱ्या वर्ग मैत्रिणीच्या अंगावर पाणी जाऊ नये याची काळजी घेतली जात होती.त्या काळातील निरागस मैत्री आजही डोळ्यासमोर ताजी उभी राहते. वर्गातील काही चेहरे, त्यावरील हास्य,गृहपाठ पुर्ण न केल्यावर शिक्षकांनी दिलेला छडीचा मार,सराव परीक्षेत प्रत्येक बाकावर दोन मुलींमध्ये बसुन पेपर लिहिताना उडालेली धांदल हे सारे क्षण आजही मनात कोरलेले आहेत.नववी-दहावीत नवीन तुकड्या पडल्यावर मित्र मैत्रिणी वेगळ्या वर्गात गेल्याची खंत मनात राहायची,दहावीनंतर कोण कुठे शिक्षणासाठी गेले,कोण काय करत आहे हे क्वचितच कळत असे.
मात्र आजच्या गेट टुगेदरच्या माध्यमातुन तेच जुने वर्गमित्र आणि मैत्रिणी पुन्हा एकदा भेटत आहेत. काळानुसार चेहरे बदलले, आयुष्याच्या वाटा बदलल्या, अनेकांना ओळखणेही कठीण झाले पण मनातील आपुलकी आणि जिव्हाळा मात्र तसाच कायम आहे.जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकजण आपल्या आयुष्याचे अनुभव एकमेकांसोबत मोकळेपणाने शेअर करत आहे.
बालमैत्री ही विस्मरणीय असते, हे जरी खरे असले तरी अशा गेट टुगेदर मध्ये वास्तवतेचे भान राखणेही तितकेच गरजेचे आहे. आज प्रत्येकजण आपल्या कुटुंबात, संसारात,जबाबदाऱ्यांमध्ये आनंदाने जगत आहे.त्यामुळे भुतकाळातील भावना किंवा गैरसमज बाजूला ठेवुन,केवळ मैत्री,विश्वास आणि आपुलकी जपत सर्वांचे स्वागत केले पाहिजे.कारण कोणास ठाऊक, पुन्हा हे मित्र मैत्रिणी एकत्र कधी भेटतील की नाही.काही क्षणांसाठी एकत्र आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी त्यांची पत्नी,पती,मुले,आई वडील आणि परिवार मोठ्या विश्वासाने वाट पाहत असतात. त्या विश्वासाचा सन्मान राखत आनंदाच्या क्षणांना मनात साठवत, पुन्हा भेटूया..असे म्हणत प्रत्येकजण गेट टुगेदरचा निरोप घेतो व पुन्हा त्याच आठवणी घरी जाऊन परिवारासह आनंद व्यक्त करतो.
गणेश रानबा वाघमारे
सामाजिक कार्यकर्ता, धाराशिव