
मुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे.
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची गेल्या २१ वर्षांत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. सध्या ते दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य या महत्त्वाच्या विभागांच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी अनेक ठोस आणि धाडसी निर्णय घेतले. विभागातील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबवली. विशेषतः बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणत संबंधितांवर कारवाई करून त्यांनी प्रशासनात शिस्त प्रस्थापित केली.
ऑगस्ट २००५ मध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूर येथे सेवेला सुरुवात केलेल्या मुंढे यांनी देगलूर, नागपूर, वाशिम, कल्याण, मुंबई अशा विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, सीईओ तसेच विविध विभागांमध्ये वरिष्ठ पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या नेमणुका पुढीलप्रमाणे:
२००५ : प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
२००७ : उपजिल्हाधिकारी, देगलूर
२००८ : सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
२००९ : आयुक्त, आदिवासी विभाग
२००९ : सीईओ, वाशिम
२०१० : सीईओ, कल्याण
२०१८ : सहसचिव, नियोजन
२०१८ : प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
२०२० : आयुक्त, नागपूर महापालिका
२०२० : सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
२०२१ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
२०२२ : आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
२०२३ : सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास
२०२३ : सचिव, मराठी भाषा विभाग
३१ मार्च २०२६ रोजी त्यांच्या नवीन बदली आदेशानुसार दिव्यांग कल्याण विभागातून त्यांची महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या हा प्रशासनात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तरीही प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाच्या धडाक्याने वेगळी छाप सोडली आहे.

