
विश्व प्रशांत न्यूज
धाराशिव प्रतिनिधी
जिल्ह्यातील स्थानिक उद्योग आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावे,तसेच जिल्ह्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी,यासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर विशेष भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हा निर्यात प्रचालन समिती (DEPC) ची महत्त्वपूर्ण बैठक २९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत सन २०२६-२७ साठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा निर्यात कृती आराखड्यावर (Export Action Plan) सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा सदस्य सचिव अमोल बळे यांनी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.त्यानंतर हर्षल पटनी यांनी सन २०२६-२७ या वर्षासाठीचा जिल्हा निर्यात कृती आराखडा सादर केला.
वर्षभरात निर्यातीत ३५.७० कोटी रुपयांची वाढ
आराखडा सादर करताना देण्यात आलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७७.९५ कोटी रुपयांची निर्यात झाली.विशेष म्हणजे,सन २०२४-२५ च्या तुलनेत निर्यातीत ३५.७० कोटी रुपयांची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.जिल्ह्यातून प्रामुख्याने रिफाईंड शुगर,कच्ची साखर,केमिकल्स आणि सोयाबीन मील या उत्पादनांची निर्यात होत असून,त्याचबरोबर केळी आणि द्राक्षे यांचीदेखील काही प्रमाणात निर्यात केली जात आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी वाढत्या निर्यातीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात विद्यमान उत्पादनांसोबतच इतर उच्च क्षमता असलेल्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील बहुतांश निर्यात उत्पादने ही कृषीआधारित (Agro-based) असल्याने कृषी उत्पादनांवर व्हॅल्यू ॲडिशन (Value Addition) करण्यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच निर्यातक्षम उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यात फायटोसॅनिटरी लॅबोरेटरी (Phytosanitary Laboratory), गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आणि कोल्ड स्टोरेज उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.यासाठी नव्याने विकसित होणाऱ्या वडगाव (सिं.) एमआयडीसी परिसरात जागा राखीव ठेवण्याबाबत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. बैठकीत डीजीएफटी (DGFT) चे प्रतिनिधी श्री.कोकणे यांनी शासनाच्या विविध निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती दिली.जिल्ह्यात निर्यात वाढीस चालना देण्यासाठी लवकरच 'एक्सपोर्ट आउटरिच' कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पायाभूत सुविधांतील त्रुटी, गुणवत्ता मानके आणि बाजारपेठेतील अडचणी दूर करण्यासाठी समन्वयाने उपाययोजना करण्यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले. मध्यस्थांऐवजी थेट निर्यातीचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले. जिल्ह्यातील उद्योजक व एमएसएमई (MSMEs) घटकांना मध्यस्थांमार्फत निर्यात करण्याऐवजी स्वतः थेट निर्यात करण्याचे आवाहन केले.असे केल्यास शासनाच्या विविध निर्यात प्रोत्साहन व अनुदान योजनांचा लाभ उद्योजकांना थेट आणि अधिक प्रभावीपणे मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वृद्धिंगत करण्यासाठी औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले.
भविष्यात धाराशिव जिल्ह्याची निर्यात परिसंस्था (Export Ecosystem) अधिक सक्षम करण्यासाठी, उद्योजकांना आवश्यक पाठबळ देण्यासाठी आणि जिल्ह्याच्या निर्यातीस दीर्घकालीन गती देण्यासाठी ठोस रोडमॅप (Roadmap) तयार करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.