विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

धाराशिव – विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या माध्यमातून विविध योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती.शैलेश ब्रम्हे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज १ मार्च रोजी धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन न्या.श्री.ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात न्या.श्री.ब्रम्हे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती अभिश्री देव,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.

न्या.ब्रम्हे पुढे म्हणाले की,या महाशिबिरासाठी आलेल्या नागरिकांनी येथे लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन संबंधित विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना,अभियान व उपक्रमांची माहिती काळजीपूर्वक जाणून घ्यावी.आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याची माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता करावी.केवळ स्वतःपुरत्याच या योजनांची माहिती जाणून न घेता आपल्या गावातील नागरीकांना, लाभार्थ्यांना तसेच आपल्या शेजाऱ्यांना या महामेळाव्यातून गावाला पोहोचल्यावर त्यांना योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्यात प्रोत्साहित करावे.योजनांच्या लाभामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.असे न्या.ब्रम्हे यांनी सांगितले.

विधी सेवा प्राधिकरण व प्रशासनाने या महाशिबिराच्या माध्यमातून योजनांची माहिती देणे व त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे सांगून न्या.श्री.ब्रम्हे म्हणाले की, भारतीय संविधानाने सामाजिक व आर्थिक न्याय सांगितला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे.