
धाराशिव : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणेमधील त्रुटींमुळे अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले येऊन वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाढीव वीजबिलांची दुरुस्ती करून नागरिकांना बिलाची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे.
आमदार पाटील यांनी सांगितले की, सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असताना अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित होत असून जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात जुने मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून त्यानंतर बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत.
नोव्हेंबर महिन्यात ७०० रुपये आणि डिसेंबरमध्ये सुमारे ८०० रुपये येणारे वीजबिल जानेवारी महिन्यात थेट १५ हजार रुपयांच्या घरात गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या बिलांमध्ये दुरुस्ती करावी तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत हप्त्यांमध्ये बिल भरण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. मात्र वीजबिल भरणे आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच वीजदर कमी करण्यात आले असून स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांना बिलावर १० टक्के सवलत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.