कार्डिओलॉजिस्ट नसल्याने ऑपरेशन नाकारले; धाराशिव मेडिकल कॉलेजवर पुन्हा प्रश्नचिन्ह – MRI, CT-Scan अडखळत सुरू तर Cath Lab बंद असल्याची तक्रार
विश्व प्रशांत न्यूज – धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे.
या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना यापूर्वी थोडासा बीपीचा त्रास असल्याने ऑपरेशनसाठी कार्डिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु महाविद्यालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना सोलापूर येथे जाऊन ऑपरेशन करून घ्यावे, असा सल्ला देण्यात आला.
यामुळे धाराशिव मेडिकल कॉलेजमधील आरोग्यसेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांमध्येही “धाराशिवचे मेडिकल कॉलेज म्हणजे फक्त प्राथमिक उपचार आणि मलमपट्टीपुरतेच मर्यादित आहे” अशी नाराजी व्यक्त होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना येथे प्राथमिक उपचार करून सोलापूरला पाठवण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे अर्थकारण आधीच कोलमडलेले असताना उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हा एकमेव आधार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र येथेच जर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील, तर करोडो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचा आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा उपयोग नेमका कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय मशीन, सीटी-स्कॅन मशीन अनेकदा बंद असतात, अशी तक्रारही त्यांनी केली. तसेच ऑर्थोपेडिक विभागातील अनेक रुग्णांना विविध कारणे सांगून खाजगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचे रुग्णांकडून ऐकायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी रुग्णालयांशी काही लागेबांधे आहेत का? असा संशयही नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनीही धाराशिव मेडिकल कॉलेजमधील एमआरआय मशीन आणि कॅथलॅब बंद का आहेत? असा प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते.
जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूरला हलवताना अर्ध्या वाटेतच प्राण गमावल्याची शेकडो उदाहरणे असल्याचेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रुग्णसेवक तथा शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना योग्य व तातडीची आरोग्यसेवा मिळावी, अशी मागणी केली.
