विश्व प्रशांत न्यूज / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (दि.२५) चुना लावो आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याचे समोर आले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मनोज जाधव यांनी जिल्हा परिषद येथील कृषी विकास अधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीतील कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात भेट दिली. या दोन्ही ठिकाणी एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर कृषी विभागाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत उडवा-उडवीची उत्तरे देत असून मागितलेली माहिती दिली जात नसल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात कृषी आयुक्तांनाही पत्र पाठवले; मात्र त्याचीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी विभागाच्या प्रसिद्धीपत्रकांनुसार धाराशिव जिल्ह्यात सुमारे ८ हजार मेट्रिक टन युरिया खत शिल्लक असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळाले नाही. त्यामुळे या खतावर मिळणारी जवळपास २५ कोटी रुपयांची सबसिडी नेमकी कुणाच्या घशात गेली, असा गंभीर सवाल मनोज जाधव यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकाराच्या निषेधार्थ रविवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सरकार जवाब दो” अशी मागणी करत कृषी विभागाच्या नावाचा दगड ठेवून त्याला चुना लावण्याचे प्रतीकात्मक आंदोलन केले.
