
धाराशिव : जिल्ह्यात खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात खत मिळत नसल्याच्या आरोपावरून शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी जिल्हा परिषद येथील जिल्हा कृषी विकास अधिकारी व सेंट्रल बिल्डिंगमधील जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या विरोधात अनोखे आंदोलन छेडले. संबंधित अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांवर बेशरमाचा फाटा ठेवत त्यांनी निषेध नोंदवला.
कृषी विभागाने काढलेल्या प्रेस नोटनुसार धाराशिव जिल्ह्यात ७,८८३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून अतिरिक्त ५,५०० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. म्हणजेच जिल्ह्यात सुमारे १३ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याचे अधिकृतपणे नमूद करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील एकाही खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याची तक्रार मनोज जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही उपलब्ध खत नेमके कोणत्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले, याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फोनद्वारे खत मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे १३ हजार मेट्रिक टन खताचा साठा नेमका कुठे गेला, तो काळ्या बाजारात विकला गेला का, तसेच खत विक्रीतून शासनाच्या सुमारे ४० कोटी रुपयांहून अधिक सबसिडीचा गैरवापर झाला का, असे गंभीर प्रश्न या आंदोलनामुळे उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.
