धाराशिव – “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा,या उदात्त उद्देशाने अल्पसंख्यांक विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समिती, महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा परिषद धाराशिव (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आल्या.जिल्हा परिषद कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला,धाराशिव येथे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धांचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्रीमती. साळुंके म्हणाल्या की,“श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांचे जीवन हे त्याग,सत्य आणि मानवतेचे तेजस्वी प्रतीक आहे.त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना धैर्य,मूल्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळते.अशा उपक्रमांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला योग्य दिशा मिळते.”
या प्रसंगी स्पर्धा प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रीमती रंजना मैंदर्गी,महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे, केंद्रप्रमुख निलेश नागले,लक्ष्मण पाटील,समीर जाधव,बी.एम. आडगळे,समीर सय्यद,सुहास लोमटे, राजाभाऊ गिरी,श्री.विनोद जानराव, मुख्याध्यापिका सुनीता इंगळे तसेच राजेंद्र अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये वक्तृत्व, गायन,चित्रकला व निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या शौर्य,बलिदान, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान तसेच सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला.वक्तृत्व स्पर्धेत ओघवत्या भाषेत विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली, गायन स्पर्धेतून भक्ती व देशप्रेमाची भावना व्यक्त झाली,चित्रकलेतून त्याग व शौर्याचे दृश्यरूप साकारले गेले,निबंध लेखनातून विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण व चिंतनशील दृष्टी अधोरेखित झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्रीमती रंजना मैंदर्गी यांनी, सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार समीर जाधव यांनी मानले.