धाराशिव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२५-२६ अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने त्रुटीपूर्तता व अर्जाची हार्डकॉपी जमा करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता ११ वी,१२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी या योजनेअंतर्गत भोजन भत्ता,निवास भत्ता,निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आयुक्त,समाज कल्याण यांच्या दिनांक ३१ जुलै २०२४ च्या परिपत्रकानुसार वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने सन २०२५-२६ करिता स्वाधार योजनेसाठी एकूण १७५८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २५९ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आढळून आले आहेत. तसेच ११२ विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत ऑनलाईन प्रणालीवर भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांची हार्डकॉपी समाज कल्याण कार्यालयात जमा केलेली नाही.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्रुटीपूर्तता केलेली नाही तसेच अर्जाची हार्डकॉपी (अर्ज व आवश्यक कागदपत्रांचा संच) समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर केलेली नाही,अशा विद्यार्थ्यांनी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२६ पूर्वी त्रुटीपूर्तता करून आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करावीत.विहीत मुदतीत त्रुटीपूर्तता व कागदपत्रे जमा न केल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरविण्यात येईल,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.याबाबतीत कोणतीही अडचण असल्यास सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन श्री.सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.