धाराशिव – : १५ जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
दिवंगत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.त्यांच्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे राज्याचा बहुमान वाढला असून नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी,या उद्देशाने खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध क्रीडा संघटना व संस्थांच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्केटींग,कराटे,मैदानी खेळ, कुस्ती,तायक्वांदो,फुटबॉल,खो-खो, बुद्धीबळ,बॅडमिंटन,नेटबॉल, डॉजबॉल आदी क्रीडा स्पर्धांचा समावेश होता.या कार्यक्रमाची सुरुवात ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर तालुका क्रीडा अधिकारी श्री. भैरवनाथ नाईकवाडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी श्री.संतोष नलावडे,गटविकास अधिकारी,पंचायत समिती,धाराशिव यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा कोणताही एक खेळ निवडून त्यामध्ये सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते,असा मोलाचा संदेश उपस्थित खेळाडूंना दिला.
या कार्यक्रमांतर्गत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान सोहळा पार पडला.या सोहळ्यात श्री.संतोष नलावडे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती,धाराशिव,श्री.दत्तात्रय लांडगे, उपशिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव,श्री.भैरवनाथ नाईकवाडी, तालुका क्रीडा अधिकारी,श्री.विश्वास खंदारे,क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्केटींग संघटनेचे प्रविण गडदे,अॅथलेटिक्स संघटनेचे योगेश थोरबोले,फुटबॉल संघटनेचे जावेद शेख,कुस्ती संघटनेचे मनोज जाचवर, ज्युदो संघटनेचे कैलास लांडगे, तायक्वांदो संघटनेचे महाजन तसेच विविध पालक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अंजिक्य वराळे यांनी केले,आभार श्री.विश्वास खंदारे,क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील जान्हवी पेठे, किशोर भोकरे, सुरेश कळमकर व व्यंकटेश दंडे यांनी परिश्रम घेतले.