धाराशिव : आगामी धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेंबळी गटातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी अथवा पक्षीय पाठबळ नसताना, समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेले सय्यद कलीम मुसा हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
याबाबत माहिती देताना त्यांचे निकटवर्तीय सुरेश चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ही उमेदवारी कोणत्याही राजकीय महत्वाकांक्षेपोटी नसून, केवळ समाजसेवेच्या भावनेतून आहे.
सय्यद कलीम मुसा यांनी आजवर कोणत्याही पदाचा अथवा राजकीय ओळखीचा वापर न करता सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होत असताना त्यांनी सहकाऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या लढ्याची दखल घेत सन 2007 मध्ये सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यात आली, हे त्यांच्या समाजसेवेचे ठोस उदाहरण मानले जाते.
सन 2008 मध्ये हिंदू व मुस्लिम समाजाला समान आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण केले होते. सामाजिक समता व न्याय हाच या आंदोलनामागील उद्देश असल्याचे त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते.
कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही प्रसिद्धीचा गवगवा न करता त्यांनी स्वतः पुढाकार घेत अन्नदान व धान्य किटचे वाटप केले. तसेच सर्वधर्मीय सलोखा जपण्याच्या भावनेतून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हनुमानजी मंदिर उभारणीत सहभाग घेतला, ही बाब आजही अनेक नागरिकांच्या स्मरणात आहे.
कोणाचाही प्रश्न असो, दिवस असो वा रात्र—फोन उचलून मदतीसाठी तत्पर राहणे हीच त्यांची खरी ओळख असल्याचे नागरिक सांगतात. कोणताही राजकीय आधार नसताना केवळ समाजाच्या विश्वासावर पुढे येत असल्यामुळे बेंबळी गटात त्यांच्या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात सहानुभूती व्यक्त होत आहे.
“सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी निवडणूक लढवायची आहे,” अशी भूमिका असल्याचे सुरेश चव्हाण यांनी नमूद केले. त्यामुळे बेंबळी गटातील निवडणूक चर्चेत हा निर्णय नवा व वेगळा प्रयोग ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.