कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर
धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये अखेर धाराशिवमधून मोठी राजकीय घडामोड समोर आल्याची चर्चा रंगली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिल्याचे सांगितले जात आहे.
आज दिवसभर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध भागातील कार्यकर्त्यांनी एकमुखी भूमिका घेत आपण शिंदे गटात जावे, अशी मागणी केल्याचे समोर आले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून आपण शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेत असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत स्पष्ट केल्याची माहिती समोर आली.
यावेळी बोलताना, “माझ्यासोबत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यभर ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू होती. अनेक खासदारांच्या संभाव्य राजकीय बदलांबाबत तर्कवितर्क लावले जात असताना आता या घडामोडींना दिशा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील शिवसेनेच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी हा राजकीय धक्का मानला जात असून आगामी काळात राज्यातील समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांवरही या निर्णयाचा परिणाम होणार का, विरोधक आणि सहकारी यांच्यातील भूमिका बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या निर्णयाचे पडसाद राज्याच्या राजकारणात अधिक स्पष्टपणे उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.