५ व ६ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीग्रस्त भागांना देणार भेट
धाराशिव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवार, दि. ५ आणि गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणे आणि त्यांना जाहीर झालेली सरकारी मदत मिळाली आहे की नाही, याचा आढावा घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे अतिवृष्टीबाधित भागांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या हातात खरोखर पोहोचली आहे का, मदत मिळण्यात नेमके काय अडथळे येत आहेत आणि सध्याची जमिनीवरील परिस्थिती काय आहे, हे ते जाणून घेणार आहेत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या दोन दिवसीय दौऱ्यात ते विविध गावांना भेटी देणार आहेत.
दौऱ्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५
- दुपारी २:०० वा. – पाथरुड (ता. भूम)
- दुपारी ३:३० वा. – शिरसाव (ता. परंडा)
- सायं. ५:०० वा. – घारी (ता. बार्शी)
- सायं. ७:०० वा. – धाराशिव, बीड, लातूर
जिल्हा पदाधिकारी बैठक व मुक्काम (स्थळ: धाराशिव)
गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५
- सकाळी १०:०० वा. – करजखेडा (ता. धाराशिव)
- दुपारी १२:०० वा. – भूसनी (ता. औसा)
या दौऱ्यात शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
