जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा आदेश
धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला असून,या कार्यक्रमाच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने धार्मिक स्थळे, रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करणे निवडणूक शिस्त आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरू शकते,अशी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची खात्री झाली आहे.त्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आदेश जारी केला आहे.जिल्ह्यातील धार्मिक स्थळे,रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास बंदी घालण्यात येत आहे.
हा आदेश दि.४ नोव्हेंबर २०२५ ते दि.३ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू राहील.