
धाराशिव – पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता, धाराशिव नगरपरिषदेने शहरातील सर्व रहिवाशांना व मालमत्ताधारकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. शहरातील जी इमारती व बांधकामे धोकादायक अवस्थेत आहेत, किंवा ज्यांचे काही भाग कमकुवत व धोक्याच्या श्रेणीत मोडतात, अशा ठिकाणी कोणीही वास्तव्य करू नये, असे आवाहन नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटद्वारे केले आहे.
मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे की आगामी काळात होणाऱ्या अतिवृष्टी, वादळ, भूस्खलन व इतर आपत्तीजनक हवामानामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांचे प्राण व मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा इमारती तात्काळ रिकाम्या करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे अत्यावश्यक आहे.
या संदर्भात घरमालक, भोगवटादार व संबंधित कुटुंबियांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. विशेषतः अशा धोकादायक इमारती व त्यांचे भाग रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणतीही दुर्घटना झाल्यास संबंधित मालमालक व भोगवटादार यांना जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलम 195 व त्याच्याशी संबंधित इतर कलमांनुसार या धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आली असून, योग्य ती कारवाई करण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.
धाराशिव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसुधा फड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले की, “शहरवासीयांनी आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने गंभीरपणे या इशाऱ्याची दखल घ्यावी. कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही.”
तरी नगरपरिषदेच्या या सूचनेनंतर शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते,समाजसेवक यांनी नागरिकांमध्ये जागरूकतेचे वातावरण निर्माण करून धोकादायक असलेल्या इमारतींमधील स्थानिक नागरिकांना प्रशासनाच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास सांगून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी फड यांनी केले.