धाराशिव – भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देत देशाच्या सुरक्षेची नवी शौर्यगाथा लिहिली आहे. या शूर पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेतर्फे धाराशिवमध्ये एक भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे.
या वेळी परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमधून देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व भारतीय सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्याचा उद्देश शिवसेनेचा आहे.
ही तिरंगा रॅली २२ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जिजाऊ चौक, बार्शी नाका येथून सुरुवात होणार असून, जिजामाता चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप होईल. रॅलीत हजारो शिवसैनिक, युवक, महिला, व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे..
रॅलीच्या माध्यमातून धाराशिव शहरात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा संचारणार असून, तिरंग्याच्या रंगात रंगलेला प्रत्येक रस्ता भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक ठरणार आहे.