मुंबई – राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेसाठी घेतले जाणारे उपाय आता अधिक प्रभावी होणार आहेत. यासाठी रस्ता सुरक्षा निधीच्या वापराबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
मंत्रालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत रस्ता सुरक्षा निधी, ऑटो-रिक्षा व मीटर टॅक्सी तक्रारी, ऑनलाईन बदली धोरण आणि एस.टी. महामंडळाच्या जाहिरात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एस.टी. महामंडळाचे अधिकारी देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. जनजागृतीसाठी ब्रँड अॅम्बेसिडरची नेमणूक करावी, तसेच सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग आणि इतर आवश्यक मार्किंग यांची पूर्तता व्हावी.
एस.टी. महामंडळाचा महसूल वाढवण्यावर भर
एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी जाहिरात धोरण तयार करण्याचा निर्णय झाला आहे. जाहिरात व पार्सल सेवा, तसेच कोल्ड स्टोरेजसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नवीन बांधले जाणारे एस.टी. निवारे बंदिस्त आणि पी.पी.पी. तत्वावर उभारण्याबाबतही अभ्यास केला जाणार आहे.
रिक्षा व टॅक्सी सेवा – सुधारणा अनिवार्य
रिक्षा व टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी वाढल्याने यावर उपाययोजना करण्याचे ठरले आहे. सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर बसवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच बाईक टॅक्सी योजना रोजगार निर्मितीस मदत करणारी असल्यामुळे, या योजनेत सुधारणा करण्याबाबतही कार्यवाही होणार आहे.
ऑनलाईन बदली धोरण – पारदर्शकतेचा आग्रह
मोटार वाहन विभागात राबवले जाणारे ऑनलाईन बदली धोरण अधिक पारदर्शक व सर्वसमावेशक असावे, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. यासाठी इतर विभागांतील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास केला जाणार आहे.