धाराशिव – देशाच्या संरक्षणासाठी सीमेचे सैनिक कायम कार्यरत असतात.या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे.आपण प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग देवून सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजना तयार करण्यासाठी ध्वज दिन निधी संकलित करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आज २० डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२४ निधी संकलनाचा शुभारंभ मान्यवरांनी वीर जवान ज्योतीस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलनाने केला.
यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि उपस्थितांकडून ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल शरद पांढरे म्हणाले,आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे.आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक,माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो.त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिनी निधी संकलनात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष,प्र.अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील,तहसीलदार (महसूल) अभिजीत जगताप,एनसीसीचे कमांडर ऑफिसर श्री.मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
वीरपत्नी/वीरमातांचा सन्मान
विविध युद्धामध्ये शहीद झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांच्या वीर पत्नी व वीर माता यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पाल्यांचा विशेष गौरव
माजी सैनिक यांच्या विविध शैक्षणिक वर्षात यश संपादन केलेल्या पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
माजी सैनिक यांना स्वयंरोजगारासाठी ३ लक्ष रुपये मदत करण्यात आली. यावेळी ध्वजदिन निधी संकलनाची सुरुवात उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना ध्वजाचा बॅच लावून करण्यात आली.