धाराशिव – जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण ५९४ पाणी पुरवठा योजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत गावांतील नागरिकांना प्रती माणशी दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या जिल्ह्यातील ५९४ योजनांपैकी २४६ पाणीपुरवठा योजना पूर्णतः कार्यान्वित करण्यात आल्या आहे.या योजनांचा देखभाल व दुरुस्तीचा कार्यभार संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आला आहे.उर्वरित ३४८ योजनांपैकी ११५ योजना ७६ ते १०० टक्के पूर्ण झाल्या आहे.१३५ योजना ५१ ते ७५ टक्के पूर्ण झाल्या असून,७० योजना २६ ते ५० टक्के, तर २७ योजना २५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्या आहेत.
योजनांची कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांना ०.५ टक्के ते ६ टक्केपर्यंत दंड ठोठावण्यात येत आहे.जाणीवपूर्वक काम टाळणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.अशा ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कमही जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या उपांगांसाठी आवश्यक जागा विलंबाने उपलब्ध झाल्यामुळे ६९ गावांतील पाणीपुरवठा योजना उशिरा सुरू झाल्या आहेत.याशिवाय, काही योजनांचा उदभव हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील प्रस्तावित जलस्रोतांवर अवलंबून असल्याने त्या विहिरी अर्धवट स्थितीत आहेत,त्यामुळेही काही कामे रखडली आहेत.
याशिवाय, ३८ योजनांचे जलस्रोत अयशस्वी ठरल्याने नव्याने प्रमाणित जलस्रोत उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.परिणामी,अशा योजनांचे काम देखील विलंबाने सुरू करण्यात आले आहे.
संबंधित योजनांना आवश्यक मुदतवाढ दिली असून,कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ठेकेदारांकडून वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जात असून, उशीर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी दिली.