तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील बाळूबाई साठवण तलाव ते फुलवाडीकडे जाणाऱ्या कॅनलच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. केवळ मुरूम टाकून दुरुस्ती सुरू असल्याने पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लवकरच उन्हाळा सुरू होणार असताना ही दुर्दशा ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरणार आहे. या कामामुळे चिवरी पाटी आणि वत्सला नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाझरणार असल्याचा आरोप केला जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ आर्थिक लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, या कॅनलमधून वाहणारे पाणी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत अधिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.