धाराशिव – राज्यात Guillain-Barré Syndrome (GBS) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे रुग्ण वाढत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.
जीबीएस हा एक परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार आहे,जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ट्रिगर होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये तो Campylobacter Jejuni, Influenza, Cytomegalovirus, Epstein-Barr आणि Zika सारख्या संसर्गांनंतर दिसून येतो. विशेषतः,अतिसार किंवा श्वसन संसर्गानंतर काही रुग्णांना हा त्रास जाणवतो.
लक्षणे आणि धोका
जीबीएसची प्रमुख लक्षणे म्हणजे हात-पायातील अशक्तपणा,सुन्नपणा, मांसपेशींमध्ये वेदना आणि श्वसनास अडथळा.हा आजार संसर्गजन्य नसला तरी,काही गंभीर प्रकरणांमध्ये वेळेत उपचार न घेतल्यास जीवघेणा ठरू शकतो.बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात,मात्र काहींना दीर्घकालीन त्रास जाणवू शकतो.
काय करावे
पिण्याचे पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी,स्वच्छ आणि उकळलेले पाणी प्यावे.भरपूर पाणी प्याव पौष्टिक आणि ताजे अन्न सेवन करावे.परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता राखावी.लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जावे.
काय करू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये.आरोग्याशी संबंधित अफवांवर विश्वास ठेवू नये.
जीबीएस आजाराबाबत नागरिकांनी घाबरू नये,मात्र आवश्यक ती काळजी घ्यावी.लक्षणे दिसल्यास विलंब न लावता उपचार घ्यावेत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. एल.हरिदास यांनी केले आहे.