धाराशिव/कळंब – कळंब शहर अतिक्रमणाच्या समस्येत गुरफटलेले असून, या कारणामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा रोजचाच झाला आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पाळले जात नाहीत, आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांवर काही लोकांनी अतिक्रमण करून गाळे उभे केले आहेत आणि ते भाड्याने देऊन आपली मालमत्ता वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, यावर प्रशासन आणि पोलीस विभाग हे डोळेझाक करत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
अतिक्रमण हटवणे आणि वाहतुकीची समस्या सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीसुद्धा, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.
अशा प्रकारच्या कारभारामुळे कळंब शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने योग्य पावले उचलावीत, हीच अपेक्षा!