धाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन
खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर

धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अनेक शेतकरी आजही योजनांपासून वंचित आहेत.त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून योजनांची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व तयारी २०२६ आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड,महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा शिंदे तसेच कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती भाऊसाहेब खरसडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,कृषी विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषीविषयक ॲप विकसित करून शेतकऱ्यांना त्यात सहभागी करावे.यामुळे पारदर्शकता वाढेल आणि योजनांची माहिती अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल.हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता असून पर्जन्यमान कमी राहू शकते.परिणामी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.त्यामुळे आतापासूनच व्यापक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाई,उशिरा होणारा पाऊस आणि संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रशासनाने जनजागृतीसह उपाययोजनांची पूर्वतयारी ठेवावी,असेही त्यांनी सांगितले.राज्य शासनाने ३०० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून पुढील वर्षी जिल्हा नियोजन समिती निधीतून यासाठी तरतूद केली जाईल. वृक्षलागवडीसाठी आवश्यक रोपे जिल्ह्यातच तयार व्हावीत,नर्सरी उभारणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि यासाठी ठोस आराखडा तयार करावा,अशा सूचनाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या.
आमदार कैलास पाटील यांनी प्रत्येक गावात कृषी विभागाचे ‘चावडी वाचन’ झाले पाहिजे,अशी भूमिका मांडली.