धाराशिव – राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागविली असून,त्यानुसार विहीत नमुना प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ मध्ये माहिती संकलनाचे काम सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवर थकीत सभासदांच्या कर्ज खात्यांबाबत तसेच इतर अनुषंगिक माहिती गोळा केली जात आहे.
मात्र,सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या बहुतांश सभासदांनी अद्याप संबंधित संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी तसेच इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून दिलेली नसल्याने माहिती संकलनात अडथळे येत आहेत.परिणामी,संस्था पातळीवर आवश्यक माहिती पूर्णपणे संकलित करता आलेली नाही.
जिल्ह्यातील ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही त्यांचे आधार कार्ड,फार्मर आयडी व अन्य आवश्यक माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेला उपलब्ध करून दिलेली नाही,त्यांनी तातडीने संबंधित संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांनी केले आहे.

