धाराशिव एसटी बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी)

धाराशिव एसटी आगारातील चालक-वाहकांच्या दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, वरिष्ठ विभागीय कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचारी वर्गातून होत आहे. विभाग नियंत्रकांनी लेखी सूचना देऊन चौकशी व कारवाईचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नसल्याचेही सांगितले जात आहे.

परिवहन विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमानुसार पुढील दिवसाचे ड्युटी बुकिंग आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र धाराशिव एसटी डेपोमध्ये हे बुकिंग नियमितपणे रात्री 9 नंतर उशिरा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालक व वाहकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच वैयक्तिक आयुष्यावरही विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे आगारात पुरेशा प्रमाणात वाहतूक निरीक्षक व नियंत्रक उपलब्ध असतानाही ही परिस्थिती कायम असल्याने परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्मचारी वर्गाने गंभीर आरोप करत म्हटले आहे की काही वाहतूक निरीक्षक आपल्या मर्जीने व कथित आमिषांना बळी पडून राजकीय पक्षांशी संबंधित ठराविक कर्मचाऱ्यांना सोयीस्कर ड्युटी देत आहेत. रोटेशन पद्धतीचा अवलंब न करता मनमानी पद्धतीने ड्युटी वाटप होत असल्याने सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना निलंबनाच्या धमक्या देणे, अवेळी बोलावून ड्युटी लावणे तसेच मानसिक दबाव टाकणे असे प्रकारही घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे ड्युटी बुकिंग रजिस्टरची नोंदणी प्रत्यक्ष वाहतूक निरीक्षकांकडून न होता इतरांकडून करून घेतली जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विभागीय नियंत्रकांनी अचानक तपासणी केल्यास तसेच रजिस्टरची पडताळणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील, असा दावा कर्मचारी वर्ग करत आहे. काही निरीक्षकांवर यापूर्वी दंडात्मक कारवाई झाल्याच्या चर्चाही असून, तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान परिवहन विभागाचे मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयास १७ मार्च रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विभागीय वाहतूक अधिकारी / विभाग नियंत्रक यांनी दिनांक 23 मार्च 2026 रोजी दिलेल्या पत्रात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या परिपत्रकातील सूचनांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच या गंभीर त्रुटींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल देखील विभाई कार्यालयास पाठविण्याचा लेखी आदेशही धाराशिव आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. तरीदेखील या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
यासोबतच ड्युटी वाटपातही मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचा आरोप समोर आला आहे. नियमानुसार कमी बेसिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाच ओव्हरटाईम किंवा डबल ड्युटी देण्याची तरतूद असताना, धाराशिव आगारात उलट चित्र पाहायला मिळत आहे. कमी बेसिक असलेल्या कर्मचाऱ्यांना सिंगल ड्युटी दिली जात असून जास्त बेसिक असलेल्या कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी देण्यात येत असल्याचे आरोप आहेत. संबंधित परिपत्रकानुसार कमी बेसिक कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतरच इतरांना डबल ड्युटी देता येते, मात्र येथे त्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर, संबंधित आगार व्यवस्थापक, बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून जोर धरत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खातरजमा करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
एकूणच, धाराशिव एसटी आगारातील हा प्रकार केवळ प्रशासनातील शिथिलतेचे उदाहरण नसून कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा ठरत असल्याने आता तरी वरिष्ठांनी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

    Spread the love

    Spread the loveधाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *