
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. “आम्ही राजस्थानच्या वाळवंटात राहत नाही, मग पाणी का नाही?” असा रोष व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईबरोबरच कचरा संकलनासाठी येणारी घंटा गाडीही परिसरात येत नसल्याची तक्रार आहे. “प्रभाग ४ मध्ये येण्यासाठी अटारी बॉर्डर आडवी आहे का?” असा उपरोधिक प्रश्न नागरिकांनी उपस्थित करत प्रशासनावर निशाणा साधला. केंद्रापासून राज्यापर्यंत सत्ता एकाच पक्षाची असताना मूलभूत सुविधा देण्यात विलंब का, असा सवालही करण्यात आला.
प्रशांत (बापू) साळुंके, सुधीर बंडगर, महेंद्र शिंदे, अजित बाकले यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा व घंटा गाडी नियमित सुरू करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सुविधा सुरू न केल्यास प्रभाग ४ मधील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
