
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर येथे होणाऱ्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विशेष नियोजन जाहीर केले आहे. दिनांक ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता काही दर्शन पास तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर संस्थानकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर प्रगटनानुसार, यात्रेच्या काळात गर्दी नियंत्रणासाठी रेफरल दर्शन पास पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच दिनांक ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत स्पेशल देणगी दर्शन पास (रु. ५००) देखील बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, सशुल्क दर्शन पास (रु. २००), अभिषेक पासधारक, धर्मदर्शन तसेच मुख दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शनासाठी सोडण्यात येणार असून, त्यानुसार भाविकांनी नियोजन करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
यात्रेच्या काळात भाविकांची सुरक्षितता आणि सुरळीत दर्शन व्यवस्था याला प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी सर्व पुजारी, महंत, सेवेकरी व भाविक भक्तांनी या निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार असून, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
