
धाराशिव – भारताची जनगणना २०२७ ही डिजिटल पद्धतीने होणारी असून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जनगणनेचे काम काळजीपूर्वक करावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (दि.२६) जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जनगणना २०२७ प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जनगणना संचालनालय,मुंबईचे उपसंचालक तथा प्रशिक्षक किरण गुरव,सहनिरीक्षक पवन गोडे,जिल्हा समन्वयक चेतन प्रकाश,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर तसेच सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंह उपस्थित होते.

यावेळी बोलताना कडवकर म्हणाले की, जनगणना २०२७ साठी तालुका पातळीवर प्रगणकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनगणनेचे कायदे कडक असून, जाणीवपूर्वक हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
श्री.खडसे यांनी जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.ग्रामीण व शहरी भागातील विकास,रोजगार आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास यामुळे शक्य होतो.तसेच केंद्र व राज्य शासनाला विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतात.मूलभूत सुविधांचे अचूक नियोजन करता येते आणि लोकसंख्येनुसार निधीचे न्याय्य वाटप शक्य होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे ही जबाबदारी आहे.
उपसंचालक किरण गुरव यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की,हे प्रशिक्षण चार्ज ऑफिसरकरिता असून पुढील दोन महिन्यांत त्यांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन केले जाईल.जनगणना दोन टप्प्यात पार पडणार असून प्रगणक प्रत्येक घरात जाऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहे.जनगणनेचे तांत्रिक पैलू,पायाभूत सुविधामाहिती संकलनाची प्रक्रिया आणि त्याचा उपयोग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या टप्प्यात प्रगणक कुटुंबप्रमुखाकडून ३३ प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करणार असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयी-सुविधांची माहिती देणे आवश्यक आहे.