आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट
धाराशिव – सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊनही केवळ निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी अनुदाना पासून वंचित राहिले आहेत. त्या सर्वानाच मदत मिळायला हवी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. वस्तुनिष्ठ परिस्थिती चा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या असून मदतीपासून वंचित उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री नीही अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख ८१ हजार शेतकऱ्यांना राज्यसरकारने २२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.याच कालावधीत धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील २४ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषांमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती. मात्र झालेले नुकसान मोठे होते. अनेक ठिकाणी सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टी असतानाही ती नोंदविली गेली नाही. त्यामुळे २०२२ साली ओढवलेल्या आपत्तीवेळी केलेली प्रक्रिया
अनुसरून उर्वरित २४ महसूल मंडळात दोन वर्षापूर्वी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरला होता अगदी तीच प्रक्रिया अनुसरून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही आपण पत्राद्वारे त्याचवेळी केली होती असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
आपण व्यक्तिशः अनेक गावातील नुकसानीची महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. यामध्ये सलग पाच दिवसात कमी-जास्त असा मिळून ५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकात थांबलेले पाणी, जमिनीवरील खरवडून गेलेली माती तसेच वाहून गेलेले पीक यामुळे अनेक भागात पिकांचे पूर्ण नुकसान झाल्याचे दिसून आले. असे असतानाही “सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मि.मी पाऊस झाल्यास” या प्रचलित निकषात बसत नसल्याने २४ महसूल मंडळातील शेतकरी मदती पासून वंचित राहिल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शासन निर्णयातील सततच्या पावसाचा “सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मि.मी पाऊस झाल्यास” हा निकष शिथिल करुन “महसुल मंडळामध्ये सलग पाच दिवसाच्या कालावधीमध्ये सरासरी ५० मिमी किंवा ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास” असा बदल करून व वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत करण्या संदर्भातही संबंधित अधिकाऱ्यां समवेत बैठकीचे आयोजन करावे अशी विंनती मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी बांधवांच्या नुकसानीपोटी त्यांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जोवर मदत मिळत नाही तोवर पाठपुरावा करणार : आमदार पाटील
स्वयंचलित हवामान केंद्रात २४ तासात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आणि शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान असल्यास अनुदान स्वरूपात शेतकर्यांना मदत दिली जाते. मात्र अतिवृष्टी झालेली असताना प्रचलित निकषात न बसलेल्या अनेक महसूल मंडळांत शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सततचा पाऊस आपत्ती म्हणून घोषित केला आहे. पीक काढणीच्या काळात सोयाबीनला बुरशीजन्य रोगाचाही प्रादूर्भाव झाला होता.शेंगातील दाण्याची प्रत खराब झाल्याने शेतकर्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे ज्या महसूल मंडळांना या नुकसान भरपाईतून वगळले आहे त्यांना जोवर मदत मिळत नाही तोवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.