जालना जिल्हा बाल कामगार मुक्त,करण्यासाठी कामाची गती वाढवावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना :- जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी अधिक गतीने प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यातील वीटभट्टी, हॉटेल, ढाबा, गॅरेज आदिसह बाल कामगार असलेल्या आस्थापनांना वेळोवेळी भेटी देवून बाल कामगार आढळुन आलेल्या ठिकाणी नियमानूसार कारवाई करावी. जिल्ह्यात बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही कारण न देता जालना जिल्हा बाल कामगार मुक्त करण्यासाठी कामाची गती वाढवा, अशा स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बेठबिगार समिती, बालकामगार समिती आणि असंघटीत कामगार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा कामगार अधिकारी अमोल जाधव यांच्यासह समितीचे सदस्य व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यात बाल मजूरी थांबवून देशाचे भविष्य वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगून कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कार्यालय काम करत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोणताही कामगार शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये. जिल्ह्यातील कामगारांच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून दृकश्राव्य चित्रफीत शेअर करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जेणेकरुन संबंधितांना लाभ देणे सोयीचे होवून खरा कामगार फसवणूक होण्यापासून वाचू शकेल. तालुकास्तरावर असलेल्या सुविधा केंद्रावर नियंत्रण ठेवा, तिथे काम कसे चालत आहे याची माहिती वेळोवेळी भेट देवून घ्यावी. कामगारांसाठी असणाऱ्या योजनेतून भांडे वाटप करतांना पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत. तरी त्याचे निराकरण वेळेत करा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कामगार विभागाच्या कामाबाबत असमाधानी असल्याचेही सांगून त्यांनी विभागाच्या एकंदरीत कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली.