



धाराशिव – २३ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस छत्रपती शिवाजी हायस्कूल,धाराशिव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शेतकरी नेते उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व उपस्थितांनी मतदार म्हणून सामूहिक शपथ घेतली.या कार्यक्रमासाठी मतदार जनजागरण समिती,धाराशिव यांना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
मतदार दिनानिमित्त प्रा.रवि सुरवसे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की,“तुम्ही उद्याचे मतदार आहात. चित्रपटातील हिरो पैसे कमावतात; मात्र देशासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे महापुरुष हे खरे सुपरहिरो आहेत.त्यांच्या जीवनकार्याचे वाचन व विचार आत्मसात केल्यास जीवनात यशस्वी होता येते.त्यांनी अतिशय सोप्या भाषेत संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रस्तावनेत शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे यांनी राष्ट्रीय मतदार दिवस व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे महत्त्व स्पष्ट केले.मतदार हा राज्यघटनेने दिलेला मौलिक अधिकार असून एका मताची किंमत अनमोल असल्याचे त्यांनी नमूद केले.संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात गट शिक्षणाधिकारी असरार पठाण यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिनाचे महत्त्व पटवून देत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व विशद केले.यानंतर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.गट शिक्षणाधिकारी असरार पठाण व एम.डी.देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
या कार्यक्रमास मतदार जनजागरण समितीचे एम.डी.देशमुख,अब्दुल लतीफ, गणेश रानबा वाघमारे,शेख रौफ,संजय गजधने,बाबासाहेब गुळीग,सचिन चौधरी, बलभीम कांबळे,युसुफ सय्यद,श्रीकांत गायकवाड,उपप्राचार्य कुंभार,शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद विर यांनी केले तर आभार प्राचार्य पाटील यांनी मानले.