धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केल्याने,त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे.
निवडणूक कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे जात,धर्म किंवा भाषावार शिबिरे व मेळावे आयोजित केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ चा वापर करून जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत,कुठेही कोणत्याही प्रकारचे जात,भाषा किंवा धार्मिक शिबिरे व मेळावे आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत.हे आदेश दिनांक १३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत लागू राहतील.