बार्शी : बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास आज २००० दिवस पूर्ण झाले आहेत. ५ जून २०१९ रोजी सुरू झालेल्या या अभियानाने साडेपाच वर्षांत एकही दिवस खंड न पडता कार्य सुरू ठेवले आहे. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत समितीचे सदस्य श्रमदान करतात.
या कालावधीत समितीने बार्शी शहर व परिसरात २५००० हून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आणि कोरोनासारख्या महामारीच्या कठीण काळातही हे कार्य अखंड सुरू राहिले.
दररोजच्या श्रमदानात वृक्ष लागवड, झाडांना पाणी देणे, माती व खत टाकणे, वाकलेल्या झाडांना सरळ करणे, कटाई करणे, परिसर स्वच्छ ठेवणे यांसारखी कामे केली जातात. समितीने शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालये, शाळा, स्मशानभूमी, मंदिर परिसर आणि ओपन स्पेस याठिकाणी वृक्ष लागवड केली आहे.
समितीकडे दुर्मिळ झाडांच्या रोपांची नर्सरी असून, दुर्मिळ बिया गोळा करून त्यांची रोपे तयार केली जातात व योग्य ठिकाणी लावली जातात. शहरात दोन ठिकाणी दुर्मिळ वृक्षांचे उद्यान उभारण्यात आले आहे.
२००० दिवसांच्या या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. याप्रसंगी कॅन्सर तज्ञ डॉ. राहुल मांजरे, प्रा. शशिकांत धोत्रे, हेल्थ क्लबचे भगवान लोकरे, पवन कुमार देशमुख, मदन देगावकर, संतोष घावटे हे मान्यवर उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी या कार्याची माहिती देताना सांगितले की, पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमामुळे बार्शी शहर हरितमय होत आहे आणि भविष्यासाठी पर्यावरण रक्षणाचा मजबूत पाया घातला जात आहे.