धाराशिव – धाराशिव शहरातचा विस्तारित भाग असलेल्या सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावर तारा बसविलेल्या नाहीत. लाईट घेण्यासाठी १०० ते २०० फूट वायर अंथरुन लाईट घेण्याची वेळ ओढवली आहे. नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी स्वखर्चाने उभा केलेल्या खांबावरती तारा ओढून देण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अर्बन २ यांच्याकडे केली आहे. दरम्यान, तारा ओढून देण्यास चालढकल केल्यास रस्ता रोकोसह विद्युत वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सांजा रोड परिसरातील रसूल शेख किराणा दुकानापासून शेख खलील यांच्या घरापर्यंत, खांडेकर यांच्या घरापासून ते अन्वर शेख यांच्या घरापर्यंत लाईन ओढून देण्यात यावे. विशेष म्हणजे तेथील नागरिकांनी व्यक्तिगत खर्चाने लाईटचे पोल रोवून घेतले असून त्यावरील जोडणी (कनेक्शन) साठी तारा राहिल्या आहेत. अंतर लांब असल्यामुळे नागरिकांना कनेक्शन घेण्यासाठी साधारणता १०० ते २०० फूट अंतर लांब सर्विस वायर टाकावे लागत आहे. अंतर जास्त असल्यामुळे कनेक्शन ढिले (लुझ) होणे, वारंवार लाईट जाणे अशा अनेक अडचणींमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यापूर्वी देखील आपल्या कार्यालयास या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देऊन व आपल्या कर्मचाऱ्यांना तोंडी सांगून देखील आजपर्यंत त्या परिसरातील खोलवर तारा बसवण्यात आलेल्या नाहीत. जर त्या पोलवर तारा बसवल्या नाहीत. तर नागरिक रस्ता रोको आंदोलन व आपल्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. त्यामुळे आपण स्वतः या मुद्द्याकडे विशेष लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी अक्षय भालेराव यांनी केली आहे.