धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील दर्गा देवस्थान समोरील परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. येथील गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
नियमित नाली सफाई व रस्ते स्वच्छता प्रशासनाने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. आठ दिवसांतून एकदा नाली सफाई करणे बंधनकारक असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही केवळ आश्वासनांची उडवा उडवी होत आहे, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, उरूस (जत्रा) पार पडल्यानंतर दोन महिने उलटले तरी अद्याप गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे डास, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.