१३७ उमेदवारांची प्राथमिक निवड
३८८ उमेदवारांची मेळाव्याला उपस्थिती
१४ स्टॉलवर ५२१ उमेदवारांनी केली स्वयंरोजगारासाठी नोंदणी
धाराशिव – रोजगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास मदत होते.युवावर्ग हा रोजगार नाही असे म्हणत आज समाजात फिरतांना दिसतो.ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे,असे अनेक उदाहरण आहे.रोजगाराचा प्रश्न आज सर्वत्र आहे.मात्र उपलब्ध रोजगार ही संधी आहे.तेव्हा मिळणाऱ्या संधीचे युवावर्गाने सोने केले पाहिजे.असे मत आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केली.
आज २९ जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून आमदार श्री. स्वामी बोलत होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंखे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजय मगर यांची उपस्थिती होती.
या रोजगार मेळाव्यात १७ खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये पात्र व नोकरी इच्छुक असलेल्या ३५७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या.यामध्ये १३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.मेळाव्यात ३८८ उमेदवार उपस्थित होते.यामध्ये १८८ पुरुष व २०० स्त्री उमेदवारांचा समावेश होता.मेळाव्यात १४ विविध विभाग व महामंडळाचे एकूण १४ स्टॉलवर ५२१ उमेदवारांनी स्वयंरोजगार मिळवण्यासाठी नोंदणी केली.श्री. मगर यांनी उपस्थित उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.डॉ.गजेंद्र जमादार,प्रा.उमेश नरवडे,प्रा.शेख,प्रा.डॉ.शोभा मिसाळ याच्यासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याते प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अंजली सूर्यवंशी यांनी, संचालन शिक्षक भैरवनाथ कानडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. जटनुरे यांनी मानले.