माविम धाराशिवचा राज्यात दुसरा क्रमांक; २०२५-२६ मधील उल्लेखनीय कामगिरी

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय धाराशिव यांनी वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यस्तरावर दुसरा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १९९५ पासून कार्यरत असलेल्या या कार्यालयाने यापूर्वी कधीही पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले नव्हते. मात्र यंदा कमी मनुष्यबळ असूनही जिल्हा व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून हे यश शक्य झाले आहे.
जिल्ह्यात पोल्ट्री, शेळीपालन, दाल मिल, हळद लागवड व प्रक्रिया अशा विविध उपजीविका प्रकल्पांत १०० टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली. प्रत्येक सीएमआरसी स्तरावर किमान तीन समान व्यवसाय उपप्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आले. बचतगटांना एकूण ३७.२१ कोटी रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, मागील वर्षाच्या तुलनेत १० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
व्हॅनरेलबल सपोर्ट फंड अंतर्गत विधवा, परित्यक्ता, अपंग, घटस्फोटीत, निराधार, भूमिहीन व अल्पभूधारक अशा ५१२ महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे ७६.८० लाख रुपये सवलतीच्या दराने वितरित करण्यात आले. प्रशिक्षण क्षेत्रातही वार्षिक लक्ष्याच्या तुलनेत १०० टक्के कामगिरी करण्यात आली आहे.
आरोग्य व पोषण उपक्रमांतर्गत ३००० हून अधिक महिलांना परसबागेसाठी बियाणे वाटप करण्यात आले. तसेच ६४ गावांतील सुमारे ४९६० महिलांची एचबी, बीपी, शुगर, थायरॉईड व बीएमआय तपासणी करण्यात आली. स्त्री-पुरुष समानता व सामाजिक जाणीवा वाढविण्यासाठी ‘माविम मित्र मंडळ’ स्थापन करून पुरुषांनाही विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सहा ठिकाणी महिला मेळावे व वार्षिक सभा घेऊन शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रत्येक मेळाव्यात ८०० ते १००० महिलांची उपस्थिती होती. यासोबतच २३८ नवीन बचतगट स्थापन करून ९२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मार्च २०२६ मध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले, ज्यातून सुमारे ८.२९ लाख रुपयांची उलाढाल झाली. याशिवाय तीन महिला शेतकरी उत्पादक कंपन्या व ‘लाडकी बहिण’ महिला सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आल्या.
गेल्या २९ वर्षांत बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून, अनेक महिलांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. तसेच बालविवाह निर्मूलन, हुंडाबंदी, दारूबंदी, कुपोषण निर्मूलन व वृक्षारोपण यांसारखे उपक्रमही प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
या सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळेच माविम धाराशिवला राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. दरम्यान, उमरगा, तुळजापूर, धाराशिव, कळंब व परंडा तालुक्यातील गरजू महिलांनी बचतगट स्थापन करून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सुखदेव चिंचोलीकर यांनी केले आहे.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *