

तुळजापूर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा ३० मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होत असून, यात्रेनिमित्त तुळजापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली आहे.
उत्सव काळात ३१ मार्च, १ एप्रिल आणि २ एप्रिल रोजी देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, १ एप्रिल रोजी देवीचा जोगवा होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस, आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिराकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.
गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत व्हावे यासाठी ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गे प्रवेश देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने रेफरल दर्शन पास ३१ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान विशेष देणगी दर्शन पास (रु. ५००) बंद राहतील.


भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत प्रथमोपचार पेट्यांसाठी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन ORS ऐवजी ज्युस टेट्रापॅकचे वाटप करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दर्शन मंडपात पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप केले जाणार आहे.
मंदिर परिसरात प्रकाशयोजना, फॅन, कुलर आणि एअर कुलिंग व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून, गाभाऱ्यातील एअर कुलिंग प्लांटचे सर्व्हिसिंग पूर्ण झाले आहे. जनरेटर आणि अग्निशमन यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.
भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी डिजिटल दिशादर्शक फलक आणि अनाउन्समेंट सिस्टीम बसविण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर, नियंत्रण कक्ष आणि ऑनलाइन-ऑफलाइन पास प्रणाली सुरळीत चालू राहील यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन मंदिर परिसरात स्वच्छता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
